राजगड : सत्ता असताना देखील विद्यमान आमदार यांनी चांगले रस्ते, वीज, पाणी आणि शैक्षणिक संस्था अशा सुविधा उपलब्ध करून न दिल्याने राजगड मागासलेला आहे. मग हे कसले कर्तृत्ववान आमदार, अशी टीका महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंवर केली.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान तालुक्यातील विविध गावांना मांडेकर यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी रेवनाथ दारवटकर, रणजित शिवतरे, भगवान पासलकर, किरण राऊत, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, संगिता जेधे, संदीप खुटवड, अण्णा देशमाने, राजू रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे आदी मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मांडेकर म्हणाले की, वेल्हे या तालूका दुर्गम असला तरी गेल्या ५० वर्षात इथं मूलभूत विकासाची काम झालेली नाहीत. रस्ते, पाणी, वीज इथले सत्ताधारी देऊ शकले नाहीत. एवढच काय तर चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था त्यांना निर्माण करता आलेल्या नाहीत. त्यामुळे इथल्या मुलांना शिक्षणासाठी आपला गाव सोडावा लागतोय.
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तालुका विकासापासून वंचित राहिला आहे विकासाला चालना देण्यासाठी रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. मतदारांनी संधी दिल्यास पुढच्या पाच वर्षात कोणताही पक्षपात न करता मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन विकास करेल हा शब्द देतो.