पौड : मुळशी तालुक्यातील गणेश मंडळा करिता आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या वतीने यंदा आदर्श गणेश मंडळा करिता अनोखे व आकर्षक बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यातील गणेश उत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा तसेच गणेश मंडळांत शिस्त निर्माण व्हावी,मंडळांनी अधिकाधिक प्रमाणात सामाजिक उपक्रम करण्यासाठी प्रेरित व्हावे याकरिता आबासाहेब शेळके मित्रमंडळ मागील तेरा वर्षांपासून तालुका स्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यावर्षी स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून त्यानिमित्ताने स्पर्धेत प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या गणेश मंडळातील कार्यकर्त्याना हेलिकॉप्टर राईड (मुळशी दर्शन ) तर गुणवंत कार्यकर्त्यांना श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीच्या सकाळच्या आरतीचा माण दिला जाणार आहे.
या अनोख्या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे कार्याध्यक्ष शाकिर शेख म्हणाले की, आम्ही मागील बारा वर्षांपासून तहसील कार्यालय व पौड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. या स्पर्धेत दरवर्षी ३० ते ४० गावांमधील १०० च्या आसपास मंडळे सहभागी होतात. आपला क्रमांक यावा याकरिता विविध गावातील मंडळामध्ये मोठी स्पर्धा असते. मंडळांनी सामाजिक उपक्रमाबरोबरच पर्यावरण पूरक उत्सव साजरा करावा याकरिता त्यांना काही निकष घालून दिलेले असतात. या निकषांच्या पूर्ततेकरिता मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत असतात.दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकाच्या मंडळांना बक्षीस म्ह्णून आपण रोख रक्कम देत असतो.सदर रक्कम ही मंडळे गावाच्या सार्वजनिक कामाकरिता खर्च करीत असतात. आपल्या मंडळाचा क्रमांक याकरिता मंडळाचे कार्यकर्ते स्वतःचा वेळव प्रसंगी पदरमोड करून मंडळाच्या कामात सहभागी होत असतात. या कार्यकर्त्यांचं वैयक्तिक स्वरूपात कौतुक व्हावे याकरिता आबासाहेब शेळके मित्रमंडळाने यावर्षी विजेत्या मंडळांच्या कार्यकर्त्यांकरिता आकर्षक बक्षीस जाहीर केले आहे. प्रथम क्रमांकाच्या मंडळातील दहा ,द्वितीय क्रमांकाच्या मंडळातून सात ,तृतीय क्रमांकातील मंडळातील पाच हेलिकॉप्टर मधून मुळशी दर्शन घडविले जाणार आहे तर काही मंडळांच्या गुणवंत कार्यकर्त्यांना दगडू शेठ हलवाई गणपती च्या आरतीचा माण दिला जाणार आहे.
या अनोख्या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन शासनाच्या निकषाप्रमाणे तसेच आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या निकषानुसार या वर्षीचा गणपती उत्सव साजरा करावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक माधवराव ऊर्फ आबासाहेब शेळके यांनी केले आहे.