माले : मुळशी धरणामुळे पश्चिम पट्ट्यातील धरण भागातील गावे विस्थापित झाली होती. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृती घडविण्यासाठी ग.प्र.प्रधान यांनी माले येथे सेनापती बापट विद्यालयाच्या उभारणीसाठी सरकारदरबारी पुढाकार घेतला. त्यांच्या योगदानामुळेच मुळशी धरण भागात शैक्षणिक परिवर्तन झाले, असे प्रतिपादन मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे संस्थापक रामचंद्र दातीर यांनी माले (ता.मुळशी) येथे केले.
थोर विचारवंत, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी प्राध्यापक ग.प्र.प्रधान यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमीत्त माले विद्यालयात झालेल्या विशेष अभिवादन सोहळ्यात श्री दातीर बोलत होते. प्रधान मास्तरांच्या परिवाराशी तीन पिढ्यांचे निरपेक्ष संबंध असणारे मालेगावातील मधुकर कुशाबा आधवडे, त्यांचा मुलगा प्रकाश तसेच नातू मयूर यांच्या हस्ते प्रधान मास्तरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस रमेश जोरी, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, रोटेरियन हेमंत वाघ, ज्योत्स्ना सराफ, संभवे गावचे माजी उपसरपंच अँड.प्रशांत जोरी, दिलीप जोरी, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत भोईटे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दातीर पुढे म्हणाले की प्रधान मास्तरांची सेनापती बापट यांच्यावर श्रद्धा होती. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात १९८० साली तत्कालीन पालकमंत्री स्व.जयतंराव टिळक यांच्या सहकार्याने धरण भागातील ५२ गावांच्या मुलांसाठी पहीली माध्यमिक शाळा प्रधानमास्तरांच्या पुढाकाराने सुरू झाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जयवंतराव टिळक यांच्या बरोबरीने टाटा कपंनीबरोबर समन्वय साधून टाटामार्फत विकास योजना राबविण्यास सुरुवात केली.
सध्या विधानसभेत सत्तेचा गोंधळ चालू आहे. तथापि ४२ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व ऊर्जामंत्री जयंतराव टिळक व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रा. ग. प्र. प्रधान यांनी एकत्र येऊन मुळशी परिसरात विकास कामांची सुरुवात केली. सत्ताधारी व विरोधी पक्ष विधायक कारणास्तव एकत्र आल्यास चांगले कसे घडते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे मुळशीची माध्यमिक शाळा व स्मृतिस्तंभ हे आहे.
आधवडे म्हणाले की सेनापती बापटांनी टाटा कंपनीविरुद्ध १०० वर्षापूर्वी सत्याग्रह केला. त्याच टाटा परिवाराने बापटांचा स्मृतिस्तंभ उभारला. याबाबत प्रधान मास्तरांनी मालेभेटीत इतिहासाची चक्रे कशी उलटी फिरतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याची बोलकी प्रतिक्रिया दिली होती. प्रधान मास्तर वारंवार माले येथे शाळेची प्रगती व स्मृतीस्तंभावर अभिवादन करण्यास येत असत. मुख्याध्यापक भोईटे यांनी आभार मानले.