पिरंगुट : प्रचंड आत्मविश्वास आणि शिकण्याची जिद्द या जोरावर तब्बल २६ वर्षांनी दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याचा यशस्वी प्रयत्न भुगांव येथील दिपकआबा मारूती करंजावाणे यांनी केला आहे.
याबाबत माहिती अशी की, दिपक करंजावणे १९९६ साली पिरंगुट इग्लिश स्कूल पिरंगुट येथे दहावीची परीक्षा देत होते माञ काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना या परीक्षेत यश संपादन करता आले नाही.हि खंत त्यांच्या मनात कायम घर करून राहिली होती. आपले सगळे मिञ दहावीची परीक्षा पास झाले आणि आपण अपयशी ठरलो याची सल त्यांच्या मनात कायम होती.त्यामुळे काहीही करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण व्हायचच असा चंग त्यांनी बांधला होता.
मार्च २०२२ मध्ये दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झाले. अभ्यास करत सहा विषयांचे पेपर व्यवस्थित पणे दिले. या परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला. यामध्ये दिपक करंजावणे हे ५४.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल २६ वर्षापूर्वीची दहावी पास होण्याची त्यांची हि इच्छा आजच्या निकालाने पूर्ण झाली आहे.
दहावीतील अपयशानंतर ते गावातील व तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिले.दरम्यान त्यांनी २००९ ते १०१४ ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पदाचा कार्यभार संभाळाला.त्यानंतर मुळशी तालुक्यात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. सध्या ते भुगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल दिपक करंजावणे यांच्यावर मुळशी तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दहावी अनुत्तीर्ण असल्याची गेल्या अनेक वर्षाची खंत मनात होती. सर्व मिञ पास झाले व पुढे गेले. आपणही दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण घ्यावे इच्छा होती.आज हि इच्छा पूर्ण झाली. यासाठी आई- वडील-पत्नी- मोठे बंधू व मुले यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले असल्याचे दिपक आबा करंजावणे यांनी सांगितले.