मुळशी तालुक्यातील वाळेण गावात वळकी नदीच्या डोहामध्ये पती,पत्नी व तीन मुली असा पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळवण जवळील वाळेण गावात शंकर दशरथ लायागुडे ( वय.३८), पौर्णिमा शंकर लायगुडे ( वय.३६),अर्पिता शंकर लायगुडे ( वय.२०), अंकिता शंकर लायगुडे ( वय. १३) आणि राजश्री शंकर लायगुडे ( वय.१२ ) यांचा वळकी नदीतील डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्व सकाळी दहाच्या दरम्यान वळकी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवत असताना पौर्णिमा या पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी तीनही मुली पाण्यात गेल्या. हे सर्व जण बुडत असल्याचे पाहून शंकर लायगुडे यांनी पाण्यात उडी मारली. यातील कोणालाही पोहता येत नसल्याने सर्व जणांचा बुडून मृत्यू झाला.या घटलेल्या घटनेमुळे संपूर्ण वाळेण गावावर शोककळा पसरली आहे. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने सदर ठिकाणी येऊन सर्व मृतदेह बाहेर काढले. पुढील तपासणीसाठी हे मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेले असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे उपस्थित होते.