पिरंगुट : " सोशल मीडियाचा अतिरेक होत असताना शाश्वत मूल्ये जपण्याची जबाबदारी सर्वांनाच पेलावी लागणार आहे. लघुला गुरू करतो तो गुरु . गुरुंचे स्थान हे चीरकाळ अढळ राहणार आहे. हल्लीचा काळ केवळ पैसा कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकजण लक्ष्मी मिळविण्यासाठी धावतो आहे. मात्र मानवा , धावू नकोस तसे असते तर कुत्र्यालाही लक्ष्मी मिळाली असती . अलीकडे असे झाले आहे की , गॉड मेक मॅन , मॅन मेक मणी बट मणी मेक मॅन मॅड . त्यामुळे परमेश्वराने मानव निर्माण केला परंतु तो पैशामागे लागला . पैशामुळे माणूस मूर्ख होऊ लागला आहे. त्यामुळे शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी व्यापक आणि परिपूर्ण कार्य असणारी व्यक्ती म्हणजे व्यास यांच्या नावाने दिला जाणार श्रीगुरू व्यास पुरस्कार राजेंद्र बांदल यांना देताना त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे. राजेंद्र बादल यांनी केलेले शैक्षणिक , सामाजिक , धार्मिक तसेच अन्य विविध क्षेत्रातील कार्य हे अष्टपैलू कार्य असल्याने त्यांना हा पुरस्कार देताना आनंद होत आहे. " असे गौरवोद्गार संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज योगिराज महाराज पैठणकर यांनी काढले.
पिरंगुट (ता.मुळशी) येथील गुरु ॲकॅडमीच्या वतीने देण्यात येणारा श्रीगुरु व्यास पुरस्कार चैतन्य विद्या प्रतिष्ठाणचे संस्थापक व पेरिविकंल शाळेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांना देण्यात आला. संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज योगिराज महाराज पैठणकर आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी उपसचिव के. के. निकम यांच्या हस्ते हा पुरस्कार सांगवी येथील समारंभात देण्यात आला. त्यानिमित्त पैठणकर बोलत होते. यावेळी गुरु ॲकॅडमिचे संस्थापक बाळासाहेब खरमाळे , संचालक शशांक खरमाळे , करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड , माजी मुख्याध्यापक विजय सर्जे , बबन घाडगे , शेखर महाराज जांभूळकर , निवृत्ती बोरकर शास्त्री आदी उपस्थित होते. यावेळी गुरु अॅकॅडमीच्या सांगवी शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ॲकॅडमीतून शिक्षण घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल , श्रीफळ व ट्रॅाफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी के.के. निकम यांनीही मार्गदर्शन केले.
सत्काराला उत्तर देताना बांदल म्हणाले , निरपेक्ष वृत्तीने केलेले कर्म नक्कीच फळाला येते. इंग्रजी माध्यामांच्या शाळांत इंग्रजी भाषेबरोबरच मातृभाषाही टिकविली पाहिजे. संस्कार आणि संस्कृती टिकविण्यासाठी प्राचीन वेद वाड्मय शालेय स्तरावर शिकविले पाहिजे. बाळासाहेब खरमाळे यांनी मानपत्र वाचन केले. शेखर जांभूळकर यांनी आभार मानले.