पिरंगूट : कासारआंबोली ग्रामपंचायतच्या सदस्या माधुरी सागर धुमाळ यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरले आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने मंगळवारी (दि. १४) हा निर्णय दिला. माधुरी धुमाळ यांच्या विरोधात कामिनी अविनाश शिंदे यांनी तक्रार दिली होती.
जानेवारी २०२१ मध्ये कासारआंबोली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये माधुरी धुमाळ या वाँर्ड क्रमांक पाच मधून नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्री या जागेवरून निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात कामिनी अविनाश शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. धुमाळ यांना २७९ तर शिंदे यांना ५६ मते मिळाली होती. त्यामुळे कामिनी शिंदे यांनी हरकत घेऊन जिल्हा पडताळणी समितीकडे तक्रार दिली होती.
कामिनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हणले होते की, माधुरी धुमाळ यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी साठी दिलेल्या कागदपत्रात तफावती आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या दाखल्यावर कुणबी असा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार सदर प्रकरण हे समितीकडून पोलिस दक्षता पथकाकडे दिले होते. त्यानुसार दक्षता पथकाने धुमाळ यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्राची पडताळणी केली असता सत्य असल्याचे पडताळणी समितीला कळविले होते. दक्षता पथकाने दिलेल्या अहवालानुसार दोन्ही बाजुंना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात आले. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीस अर्जदार उपस्थित होते मात्र तक्रारदार उपस्थित नव्हते. त्यावेळी अर्जदार यांनी आपले तोंडी म्हणणे समितीसमोर मांडले. तसेच तक्रारदार हे त्यांचे म्हणणे सबळ पुराव्याअभावी सिध्द करू शकल्या नाहीत. परिणामी अर्जदार माधुरी सागर धुमाळ यांचा हिंदू कुणबी या जातीचा दावा मान्य करण्यात आला.
याबाबत माधुरी धुमाळ यांनी सांगितले की, केवळ निवडणूकीत पराभव झाल्याने माझ्या विरोधात तक्रार दिली होती. मात्र काहीही सिद्ध झालेले नाही. शेवटी सत्याचाच विजय होते.