पौड : सध्या सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी सरकारी निधी मिळविण्यासाठी धडपडणारे अनेक पुढारी आपल्याला दिसतात. तर काहीजण केवळ निवेदने देवून श्रेयासाठीही मिरवितात. परंतू सर्वसामान्यांच्या गैरसोयींवर फुंकर घालण्यासाठी धावून येणारे थोडेच असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुळशी तालुक्याचे कार्याध्यक्ष अंकुश मोरे यांनी आपल्या दातृत्वाचा असाच एक आदर्श वास्तूपाठ आजच्या पुढाऱ्यांसमोर ठेवला आहे.
तीन महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुऴे वाहून गेलेला नांदीवली (ता.मुळशी) येथील रस्ता प्रशासनाच्या निधीची वाट न पाहता अंकुश मोरे स्वखर्चाने दुरूस्त करणार आहेत. त्यांच्या या दातृत्वामुळे १४ गावांची जीवनवाहीनी असलेल्या या रस्त्यावरून आठच दिवसात लालपरी पुन्हा धावणार असून मुळशी धरणग्रस्तांची वाहतूकींची समस्या काही अंशी सुटणार आहे.
२१ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबवणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नांदीवलीजवळ ओढ्याच्या प्रवाहामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेला होता. याठिकाणी मोठे भगदाड पडले. त्यामुळे १४ गावेवाड्यावस्त्यांना जोडणारा रस्ताच वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. एसटीही बंद झाली. त्यामुळे स्वतःजवळ दुचाकी, चारचाकी नसणाऱ्या ग्रामस्थांना पौड, पिरंगुट किंवा पुण्यात जाण्यायेण्याबाबत तारांबळ उडते. कंपन्यामध्ये काम करणाऱ्या युवकांना वेळेवर कामावर जाता न आल्याने नोकरीवरही पाणी सोडावे लागले. शेतकरी, दूग्धव्यावसायिकांचीही गैरसोय झाली. त्यात शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होवू लागले.
कुंभेरीतील दूध वाहतूकदार दिपक दळवी हे त्यांच्या पिकअपमधून दूधाच्या कॅनबरोबर क्षमतेपेक्षाही जास्त लोकांना आणत होते. हा रस्ता तातडीने करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी लोकप्रतिनीधी व अधिकाऱ्यांकडे केली. परंतू कायद्याची चौकट आणि लालफितीतील कागदांमुळे पूर्ववत रस्ता होण्यास अडचणी येऊ लागल्या.
ही बाब या भागातून फिरत असताना अंकुश मोरे यांच्या लक्षात आली. लोकांची वाहतूकीची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता एसटी जाईल एवढा रस्ता स्वखर्चातून करण्याचा निश्चय केला. माले येथील बांधकाम व्यावसायिक रमेश जोरी यांनीही ना नफा ना तोटा तत्वावर रस्त्यासाठी सर्व यंत्रणा पुरविण्याची तयारी दर्शविली. आठच दिवसात रस्ता ग्रामस्थांच्या वाहतूकीसाठी पूर्ववत करून एसटी सुरू करण्याचा मोरे आणि जोरी यांनी संकल्प केला.
या रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभापती कोमल वाशिवले, सुनिल चांदेरे, अमित कंधारे, अंकुश मोरे, विठ्ठल पडवळ, अंकुश वाशिवले, तुळशीदास राऊत, किसन पडवळ, बाबासाहेब चहाणे, कचरू पडवळ, गणपत पडवळ, वर्षा प्रकाश राऊत, बंडू गुजर, दत्तोबा ढोकळे, बबन खिलारी, लक्ष्मण पडवळ, प्रशांत ढोकळे, दिपक जोरी आदि उपस्थित होते. तथापि मोरे आणि जोरी यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वांनी कौतुक केले.