पौड : गेली अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या पौड -कोळवण या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून ते गुणवत्तापूर्ण व्हावे असे निवेदन शिवसेना नेते आबासाहेब शेळके व कोळवण खोऱ्यातील ग्रामस्थांनी मुळशीचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
पौड - कोळवण मार्गे मुंबई ला जोडणारा महत्वाचा असलेला पौड कोळवण रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावर कोळवण येथील चिन्मय विभूती,हाडशी येथील सत्य साई मंदीर,नानेगाव येथील गिरिवन प्रकल्प, मुळशी करांचे श्रद्धास्थान असलेले भालगुडी येथील स्वयंभू नारायण देव देवस्थान ,पुढे मुळशी मावळच्या सीमेवर असलेला तिकोणा किल्ला अशी महत्वाची पर्यटन केंद्र व भाविकांची श्रद्धास्थाने या मार्गावर आहेत.
मुळशीतील नागरिकांबरोबरच पुणे शहरातील अनेक पर्यटक या भागातून दररोज येजा करत असतात. तसेच मुळशीतुन मुंबई, लोणावळा व कामशेतला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने एसटी बस ही जात असतात. परंतु हा रस्ता अतिशय अरुंद व नादुरुस्त असून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. या बाबत परिसरातील नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊन व मागणी करूनही या रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.
मध्यंतरी पावसाळ्याच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या भागातील ग्रामस्थानी संबधीत काम गुणवत्तापूर्ण करण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर ते काम बंदच करण्यात आले होते. त्यानंतर सदर काम पुन्हा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली होती.परंतु अद्यापही या कामाला प्रत्यक्ष मुहूर्त लागलेला नाही. याकरिता शिवसेनेचे नेते आबासाहेब शेळके यांना या भागातील नागरिकांनी विनंती केल्याने शेळके यांनी या भागातील ग्रामस्थांसमवेत तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम यांना या रस्त्याचे काम लवकरात लवकर व गुणवत्तापूर्ण करावे असे निवेदन दिले.यावेळी मंडळाचे कार्यकर्ते शाकिर शेख, अभिजित भोंसले,पराग मालशे,समीर दुडे,शशिकांत चौरे व कार्यकर्ते उपस्थित होते.