भारत हा कृषीप्रधान देश. अर्थातच महाराष्ट्रालाही मोठी कृषी संस्कृती लाभली आहे. या कृषी संस्कृतीत महाराष्ट्रीयन लोकांचे सण आणि उत्सवही कृषी पुरकच आहे. यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा. शेतात राबणार्या लाडक्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. मालकासाठी दिन-रात्र शेतात राबणार्या साथीदारांचे ऋण फेडण्याचा सण म्हणजेच बैलपोळा.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा मोठा सण असलेला भाद्रपदी बैल पोळा मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. वर्षभर बळीराजाच्या शेतात राबणाऱ्या बैलांसाठीचा हा सण असून आज बैलांना कामात विश्रांती देऊन त्यांची पूजा करून त्यांना विविध रंग, झाली, शिंगाना तुरे लावून बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.
पोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सण असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये पुरणाच्या पोळीचे जेवण बनवून बैलांची विधीवत पूजा करून त्यांना ही गोडधोड नैवेद्य देण्याची परंपरा आजही जपली जात आहे. अनेक गावात आजही गावातील जुन्या पाटील मंडळींच्या बैलांना प्रथम मान देऊन नंतर इतर शेतकऱ्यांचे सजविलेले बैल गावातून त्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा या सणाच्या निमित्ताने जोपासली जात आहे.
कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतील बैलांचा सहभाग कमी झाला आहे. तरीही बळीराजाच्या जीवनात बैलांना त्यांचं स्थान कायम आहे. शेतक-यांच्या जोडीने शेतात राबणा-या या सच्च्या मित्राचं कॊडकौतुक करण्याचा एकमेव सण म्हणजे बैलपोळा होय. पोळयाचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे दिवस असतात. त्यांना न्हाऊ,खाऊ घालून त्यांची रंगरंगोटीकरून त्यांना सजविण्यात येते. बैल या प्राण्याबद्दल कृतद्न्य भावनांचा उत्सव म्हणजे बैलपोळा होय.
खरे तर बैलगाडा शर्यतीमुळे बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात होत होती. राज्य शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्याने आता बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात मिळणारी मातीची व प्लॅस्टर ऑफ पॅरीसची बैले विकत आणून त्याची पूजा करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.