logo
add image
add image
Blog single photo

मुळशी धरणग्रस्तांच्या सत्याग्रहाचे नवे पर्व सुरू


मुळशी : मुळशी धरणग्रस्तांच्या गेली १०० वर्षे प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांसाठी आज गांधी जयंतीनिमित्त सेनापती बापट स्मारक माले ( ता.मुळशी ) येथे अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली मुळशीतील धरणग्रस्तांनी एक दिवसीय उपोषण केले व सत्याग्रह पुकारला.

              १०० वर्षांपूर्वी मुळा आणि निळा नदीच्या संगमावर मुळशीला टाटा कंपनीने इंग्रज सरकारच्या मदतीने एका मोठ्या धरणाची निर्मिती केली. या धरणात तालुक्यांतील तब्बल ५२ गावे बुडाली होती. त्यांचे सर्वस्व बुडाले होते. अशा अवस्थेत ते मिळेल त्या ठिकाणी आजपर्यंत राहिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे सर्व लोक गेली १०० वर्षे राहत आहेत, "ती घरे आमच्या नावावर करून द्या आणि त्या सर्व घरांचे मिळून बनलेल्या गावाला गावठाणाचा दर्जा द्या" ही मागणी गेले १०० वर्षे हे सर्व ग्रामस्थ करत आहेत. मात्र त्यांना आजपर्यंत यश मिळाले नाही. ते आज स्वातंत्र्यातील पारतंत्र्यात राहत आहेत.

          मुळशी धरणातील पाण्यावर टाटा कंपनी मुंबईला वीज पुरवते, आपल्यापैकी काही गावांना शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होतोय, काही गावांना मुळशी प्रादेशिक योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळत आहे, काही गावांसाठी ही योजना प्रस्तावित आहे तर पुणे शहराला ५ टी एम सी पाणी देण्यासाठी नुकतीच राज्य शासनाने मंजुरी दिली आहे .मात्र ज्यांच्या जमिनी या धरणात गेल्या आहेत ते लोक १०० वर्षे विविध मागण्या करत आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मुळशी धरणग्रस्तांना अधिकृत घरे मिळावीत, गावठाण दर्जा मिळावा, मुळशी धरणग्रस्त वेळोवेळी करत असलेल्या विविध मागण्या आणि धरणग्रस्त भागाच्या पायाभूत विकासासाठी आणि धरणग्रस्तांच्या रोजगार निर्मितीसाठी शासनाने ५०० कोटी रुपये निधी द्यावा अशा मुख्य मागण्या असून, याच न्याय्य मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२१ या गांधी जयंतीला सेनापती बापट स्मारक येथे अनिल पवार आणि मुळशीतील धरणग्रस्तांनी एक दिवसीय उपोषण केले व सत्याग्रह पुकारला. 

             या सत्याग्रहात मुळशी सत्याग्रहाचे अभ्यासक बबन मिंडे, अनिल पवार, महेश मालुसरे, राजेश सातपुते, गणपत वाशिवले, माजी सभापती बाबा कंधारे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर,शिवसेना महिला आघाडीच्या माजी संघटीका स्वाती ढमाले,नामदेव टेमघरे, अमित कुडले, अनिल मापारी, गोविंद सरुसे, एकनाथ दिघे, दत्ता दिघे, सुभाष वाघ, विजय भुस्कुटे, नंदिनी ओझा, हनुमंत सुर्वे उपस्थित होते. 


       राजकीय मतभेद विसरून सर्वांनी हा प्रश्न मार्गी लावावा : अनिल पवार

 या वेळी अनिल पवार म्हणाले की, "पक्षीय राजकारण आणि जात, धर्म असे सर्व मतभेद विसरून सर्वांनी या समस्येवर मार्ग काढण्यासाठी एकत्र आले पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मुळशीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांनी या प्रश्नी विशेष लक्ष द्यावे आणि मुळशी सत्याग्रह शताब्दी वर्षातच हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा मुळशीतील धरणग्रस्त संघर्षातमक भूमिका घेतील. 


पाण्यावर पहिला अधिकार विस्थापितांचा : श्रीपाद धर्माधिकारी

राष्ट्रीय पाणी विषयाचे अभ्यासक आणि मंथन अभ्यास केंद्राचे श्री श्रीपाद धर्माधिकारी यांनी या उपोषण व सत्याग्रहास पाठींबा दिला तसेच पाण्यावर आणि सर्व नैसर्गिक संसाधनांवर पहिला अधिकार विस्थापित घटकांचा आणि मगच इतरांचा असायला हवा अशी ठाम भूमिका मांडली. 

add image
add image

Leave Comments

Top