logo
add image
add image
Blog single photo

मुळशीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना टप्पा दोन लवकरात लवकर कार्यान्वित करावी


पुणे : मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी आणि आसपासच्या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजा लक्षात घेता पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टप्पा क्रमांक दोन राबवणे आणि कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

        पुण्यातील विधानभवन येथे झालेल्या या बैठकीत बारामती लोकसभा मतदार संघातील विविध समस्यांसंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, हिंजवडीचे सरपंच विक्रम साखरे, मारुंजीचे सरपंच कृष्णा बुचडे, माण गावच्या सरपंच अर्चना आढाव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. 

       मुळशी तालुक्यासाठी मुळशी धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टप्पा २ योजना प्रस्तावित आहे. ती कार्यान्वित केल्यास मुळशीच्या पूर्व भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. तरी लवकरात लवकर ही योजना पूर्ण करून कार्यान्वित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय हिंजवडी, माण आणि मारुंजी भागात वाढत्या लोकसंख्येबरोबर कचऱ्याची समस्या वाढत आहे. एम.आय.डी.सी. कडून या तीन गावांसाठी कचरा प्रकल्पासाठी जागाही राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानुसार एम.आय.डी.सी. तर्फे या ठिकाणी कचरा प्रकल्पा संदर्भात पुढील कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, म्हणजे कचरा प्रश्न लवकर मार्गी लागेल, ही बाब यावेळी अजित पवार यांच्या लक्षात आणून देण्यात आली.

       एमआयडीसीकडून ग्रापंचायत क्षेत्र अंतर्गत घरपट्टी जमा केली जाते. या करा मधून ग्रामसूचीप्रमाणे विकास कामे करण्यात यावीत असा शासनाचा आदेश आहे. तरी एमआयडीसीने प्राधान्याने एसटीपी प्लांट व कचरा प्रकल्प लवकरात उभा करावा, अशी मागणी करण्यात आली.हिंजवडी, माण, मारुंजी येथील एमआयडीसीच्या हद्दीबाहेरील सोसायट्यांमध्ये अद्याप पाणी पुरवठ्याची सोय नाही. येथील सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागते. तरी या सोसायट्यांसाठी पाणी पुरवठा योजना सुरू करावी. पुणे शहर व परिसरातून हिंजवडीमध्ये काम करणारा नोकरदार वर्ग यांना येण्या जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तरी म्हाळुंगे मार्गे हिंजवडी कडे येणारा रस्ता झाल्यास हा मार्ग सर्वांना जवळचा होईल. तसेच सुस आणि वाकड वरून येणाऱ्या रस्त्यांचेही काम सुरु आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

add image
add image

Leave Comments

Top