पौड : मुळशी तालुक्यासाठी अत्यावश्यक असलेल्या उपजिल्हा रुग्णालय आणि अग्निशामक दलाच्या जागेचा मार्ग नवीन विकास आराखड्यात मोकळा झाला असून युवासेनेचे जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या जवळपास एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या विकास आराखडयात मुळशी तालुक्यासाठी भरे येथे अग्निशामक दलासाठी १ एकर तर नेरे येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी ५ एकर जागा आरक्षित ठेवण्यात आलेली असून सदर जागा ही लवकरच सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून पुणे महानगर विकास प्राधिकरणाला हस्तांतरित केली जाणार आहे. अग्निशामक दलासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे निधी उपलब्ध असून त्याचे काम देखील त्वरित चालू करता येईल असे पुणे जिल्हा मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले तर उपजिल्हा रुग्णालयासाठीच्या बांधकाम निधीसाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवून मागणी करावी लागणार असून त्यावर देखील लवकरात लवकर कार्यवाही करून पूर्तता केली जाईल असे पीएमआरडीए कडून सांगण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यात असलेल्या जवळपास १०० च्या आसपास ग्रामपंचायती, तालुक्याची असलेली पावणेदोन लाखाच्या आसपासची लोकसंख्या, येथे मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी येत असलेला नोकरदार वर्ग, लहान मोठ्या स्वरूपाच्या जवळपास ५००हुन अधिक कंपन्यांचे जाळे यांमुळे तालुक्याला स्वतःच्या हक्काच्या अशा अग्निशामक दलाची आणि उपजिल्हा रुग्णालयाची नितांत अशी आवश्यकता होती. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे आणि नुकत्याच घडलेल्या उरवडे येथील दुर्घटनेमुळे विशेष करून त्याची प्रकर्षाने गरज भासली. त्यामुळे या दोन्ही उपक्रमासाठी जागा मंजुरी झालेली बाब तालुक्यातील जनतेला निश्चितच सुखावह ठरणारी असून बऱ्याच वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले.
सदर प्रकरण हे अविनाश बलकवडे, युवासेना जिल्हा अधिकारी, सूर्यकांत साखरे, सुनील वायकर, गोविंद सरुसे, अर्जुन वायकर,राहुल जाधव, वैभव शितोळे, नरेश भरम, शुभम साखरे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागले.
मुळशी तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि उद्योगधंद्यांच्या गरजेप्रमाणे येथे स्वतःचे असे अग्निशामक दल आणि उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. स्थानिक पदाधिकारी,शासकीय अधिकारी आणि शिवसैनिकांच्या मदतीने ही मागणी शासन दरबारी गेल्या जवळपास एक वर्षांपासून लावून धरली होती. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सदर बाब विकास आराखड्यात सामावून घेतली जाईल असे आश्वासन मिळाले होते आणि त्याची विकास आराखड्यातून पूर्तता झाल्याचे झाल्याचे दिसून येत असल्याचे युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे यांनी सांगितले.