पौड : अतिवृष्टीमुळे मुळशी तालुक्यात शेती आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
बुधवार ( दि.२१) रोजी राञी मुळशी तालुक्यात अतिवृष्टी झाली.धरण परिसरात या अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. वाहत असलेल्या ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले. यामध्ये नुकतीच भातलावणी केलेली शेती वाहून गेली आहे. यात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे,कार्याध्यक्ष अंकुश मोरे,भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल चांदेरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनिल वाडकर,भगवान नाकती,महिला जिल्हा उपाध्यक्ष चंदा केदारी,संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक पोपट दुडे,मा.जिल्हा उपाध्यक्ष विनोद कंधारे,लहूशेठ चव्हाण,सतिश सुतार,जितेंद्र इंगवले,विलास अमराळे उपस्थित होते.
पाऊस अद्याप चालू असल्याने झालेल्या नुकसानीचे अंतिम पंचनामे करता येत नाही. पाऊस थांबला की तातडीने पंचनामे सुरू होतील असे मुळशी तहसिलदार अभय चव्हाण यांनी यावेळी सांगितले.