पौड : मुळशी तालुक्यात दहा दिवस तहसिल प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत यांनी पोलिसांच्या मदतीने पुकारलेल्या स्थानिक जनता कर्फ्यूचा चांगला परिणाम म्हणजे मुळशी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वञ सध्या महाराष्ट्र शासनाने लाँकडाऊन सूरू आहे. त्या लाँकडाऊन मध्येच पूर्व पट्ट्यातील भुगाव, भुकूम, पिरंगुट, घोटावडे, कासार आंबोली, पौड,लवळे, उरवडे आदी मोठ्या व्यापारी गावांमध्ये दहा दिवसांचा कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामध्ये सकाळी दोन तास दूध डेअरी तसेच दिवसभर मेडिकल आणि हॉस्पिटल्स फक्त यांना परवानगी देण्यात आली होती. नागरिकांनीही पुकारलेल्या या बंदला पाठिंबा दिला.यामुळे कोरोना रूग्णांची साखळी तोडण्यास स्थानिक प्रशासनाला मोठे यश आल्याचे दिसते.
मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या पूर्व पट्ट्यातील गावांच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,पोलिस पाटील यांची बैठक पिरंगूट येथे बोलावून १५ मे ते २५ मे आपला पूर्व भाग पूर्णपणे लाँकडाऊन करावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. या सर्व ग्रामपंचायतीनी या सूचनांचे तंतोतंत पालन करत स्थानिक ग्रामपंचायती आपापल्या गावांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात यशस्वी झाल्या. ज्या गावांमध्ये १०० च्या वर रुग्ण होते त्या गावांमध्ये आज रोजी एखादा रूग्ण सापडत आहे. मुळशी तालुक्यात दररोज दोनशे-तीनशे असे नवीन रुग्ण सापडत होते परंतु आज हीच संख्या फक्त एक आकडी आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाने कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय यशस्वी झाला आहे.
स्थानिक व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन सर्व व्यापारी बांधव तसेच उद्योजकांनी केल्यामुळे प्रशासनाला कोरोना साखळी तोडण्यात मोठे यश आले आहे.यामध्ये पिरंगुट व्यापारी महासंघ, भुकूम गाव व्यापारी संघटना, पौड व्यापारी संघटना तसेच मुळशी तालुका व्यापारी संघटना यांनी केलेले सहकार्य त्यामुळेच हा बंद यशस्वी झाल्याचे मत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी व्यक्त केले.