पौड: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच मुळशी तालुक्यातील ११ गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. मात्र तरीही काही नागरिक याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. यावर आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आज जाहीर केला आहे. अत्यावश्यक नसताना घराबाहेर पडल्यास ५०० रु. दंड तसेच वाहन ताब्यात घेऊन टाळेबंदी संपेपर्यंत जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना उगाच घराबाहेर पडणे महागात पडू शकते, त्यामुळे त्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
कोरोना विषाणूचा संसर्गचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) (२) अन्वये प्रतिबंधक उपाय योजना म्हणून आदेश जारी केले आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याने लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. होम क्वॉरंटाईन मधील रुग्ण बाहेर पडल्यास त्यावर देखील गुन्हा दाखल होणार आहे. नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवासाकरिता ई-पास लागणार अत्यावश्यक असून नाकाबंदीच्या ठिकाणी अत्यावश्यक नसताना आढळल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
"कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडल्यास ५०० रुपयाची पावती करुन आपले वाहन ताब्यात घेऊन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत जमा करून घेण्यात येईल." -अशोक धुमाळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन)