logo
add image
add image
Blog single photo

कोरोना संकट काळात सामाजिक जबाबदारीचे भान ठेवायलाच हवे


पौड : सध्या कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाला आहे.काही रुग्णांना बेड मिळत नाही तर काही रुग्णांना ऑक्सिजन मिळतं नाही. अनेक निरपराध नागरिक यात बळी गेले आहेत काही ठिकाणी कुटुंबातील अनेक कर्ती सवरती माणसे गेल्यामुळे अनेक कुटुंब आज वाऱ्यावर पडली असल्याचे चित्र दिसतंय.प्रत्येक ठिकाणी शासन व आरोग्य यंत्रणा किती पुरती पडणार हाही मोठा प्रश्न आहे.  वाढत्या लोकसंख्या वाढीमुळे आपण ग्रामीण भागात आरोग्य सेवेच्या मूलभूत सुविधा  निर्माण करू शकलो नाही हे दुर्दैवच आहे.

        यूरोप व अमेरिका या देशात ज्या प्रमाणात आरोग्य सेवेसाठी व कोरोनासाठी आवश्यक अशा सुविधा उपलब्ध होत आहेत त्या देशांनी त्या सुविधांकडे विशेष लक्ष दिले.त्या मानाने आपल्या देशात या सुविधा कमी पडत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.कोरोना हे जागतिक संकट मानून त्याचा सामना करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. 

       रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करताना अनेक ठिकाणी लोक पकडले गेले. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक काळे कारनामे आज पुढे येऊ लागले आहेत. सेवा क्षेत्र म्हणून वैद्यकीय क्षेत्र  ओळखले जाते तथापि सेवेपेक्षा मेवा महत्त्वाचा मानला जात असल्याचे चित्र आज अनेक प्रकारच्या घटनांवरून दिसून येत आहेत.पॉझिटिव्ह की निगेटिव्ह यामध्ये चालबाजी काही ठिकाणी होत आहे. सर्व आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षीपासून जीवाचे  आकांताने या संकटाचा सामना करत आहेत अनेक डॉक्टर पोलिस,आरोग्य सेवेत असणारे कर्मचारी, महानगरपालिका,नगरपालिका कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक ,शासकीय अधिकारी कर्मचारी यात बळी गेल्याचे चित्र आहे.

        वैद्यकीय सेवेत असणाऱ्या अनेक कर्मचारी, डॉक्टर यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचविले आहेत.आरोग्य यंत्रणा राब राब राबत आहेत.तथापि हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकांनी  हे क्षेत्र बदनाम केले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कुणाचे गुणदोष दाखविण्याची ही वेळ नाही तर समाजातील सर्वानी या संकटाचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे ही समाजातील सर्व घटकांची जबाबदारी आहे.आम्ही  राष्ट्राचे घटक  आहोत असे मानून प्रत्येक नागरिक या संकट समयी पुढे आला पाहिजे दुर्दैवाने हे आज दिसत नाही.मला काय त्याचे ही बेफिकीर वृत्ती वाढत आहे. प्रत्येक बाब सरकारने केली पाहिजे ही प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे.संकट काळात देशासाठी माझी फार मोठी जबाबदारी आहे हे प्रत्येक नागरिकाने मानून वागणे गरजेचे आहे. स्वयंशिस्त बाळगून राष्ट्रीय संकट समयी पुढे आले पाहिजे व आपल्या परीनं झोकून देऊ काम करणे गरजेचे आहे.

       जपान न्यूझीलंड, श्रीलंका, इस्त्राईल या सारख्या छोट्या छोट्या देशातील जनतेने धीरोदात्तपणे या संकट समयी सरकारचे पुढे जाऊन या महामारी च्या काळात आपली कर्तव्ये पार पाडून या महामारीवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या महामारीचा प्रकोप काही प्रमाणात रोखला गेल्याचे चित्रं दिसत आहे.गेल्या वर्षभरापासून या महामारीचे संदर्भात प्रसार माध्यमातून फार मोठे प्रबोधन होवून लोक अजूनही बदलत नाहीत.गावोगावी असणारे लग्न सोहळा असो की कोणते राजकीय कार्यक्रम असू की  निवडणूक असो लोक बदलायला तयार नाहीत.धार्मिक कार्यक्रम असो की अन्य कार्यक्रम त्यामुळेच आज हे कोरोनाचे अक्राळ  विक्राळ संकट आज उभे राहिले आहे.शासन,सरकार तरी काय करणार? हा मोठा सवाल आहे. पूर्वी मुंबई पुण्यात रुग्ण वाढत होते.आज अनेक गावात खेडोपाडी रूग्ण संख्येची धडकी भरणारी आकडेवारी दिसून येत आहे.या संकट प्रसंगी प्रत्येक नागरिक जेंव्हा जबाबदारी चे भान ठेवून वागेल तरच या संकटाचा आपण यशस्वी मुकाबला करू  शकतो.प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर झाली तरच हया महामारीचा आपण सक्षम मुकाबला करू शकतो.

      आज कोरोना मुळे शिक्षण व्यवस्था मोडकळीस येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.बेरोजगारी वाढली आहे.  तरुण पिढीचे भवितव्य अधांतरी बनले आहे.आपल्या देशात लसीकरण पुर्ण व्हायला अजून सहा महिने तरी लागतील त्यामुळे कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी सर्व सामान्य जनतेनेच आता पुढे आले पाहिजे.राष्ट्रीय कर्तव्य मानून या संकट समयी झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे.सरकारी नियम स्वतः हुन पाळणे व सरकारी यंत्रणेला पुर्ण सहकार्य करणे हे केले तर आम्ही ही लढाई सहज जिंकू.

      कोरोना संदर्भात सोशल मिडियातून अनेकदा चुकीचे संदेश चित्र व व्हिडिओ यांचा प्रसार चुकीच्या पध्दतीने होत असल्याचे दिसून येत आहे याचाही परिणाम तसेच नकारात्मक बातम्या याचाही परिणाम अप्रत्यक्षरित्या समाजमनावर होतं आहे. वेळ, प्रसंग फार कठीण आहे. जागतिक पातळीवर असणाऱ्या  संकटाला आम्हाला सामोरे जाताना सकारात्मक रीतीने आम्हाला या संकटाला सामोरे जाऊन आत्मबल हरवून चालणार नाही धीरोदात्तपणे या संकटाला सामोरे जाताना भविष्य काळासाठी प्रबोधन करुन आम्ही या संकटात यशस्वीपणे आत्मविश्वास पूर्वक सामोरे जाऊ या त्यासाठी जनता ,शासन, प्रशासन,आरोग्य यंत्रणा यांनी हातात हात घालून एकसंधपणे या संकटाला सामोरे जावून आपण त्यावरही मात करून या संकटातून बाहेर पडू, सध्या तरी एवढीच माफक अपेक्षा !

add image
add image

Leave Comments

Top