पौड : मुळशी तालुक्यातील पिरंगूट परिसरात असलेल्या मुबिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गरम पाण्याचा पाईप फुटून अंगावर पडल्याने २ जणांचा मृत्यू झाला आहे. चार महिन्यापूर्वी येथीलच एसव्हीएस ॲक्वा कंपनीत जळीत कांड होऊन १७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. हि घटना ताजी असतानाच मुबिया कंपनीत अपघात होण्याची घटना घडली आहे.पौड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेत श्रीहरी पांडुरंग सोनवणे (वय ३५, रा. विठ्ठलवाडी फाटा, ता.मुळशी, जि. पुणे) व सुनील जगदीश तिवारी (वय ३१, रा. शिंदेवाडी, कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे) हे मयत झाले असून इतर १ जण जखमी झाला आहे.
मुबिया कंपनीत मेंटनन्सच्या कामासाठी १४ नोव्हेंबर रोजी काही कामगार बाहेरून बोलवण्यात आले होते. त्यांचे काम चालू असताना वरून गरम पाण्याचा पाईप फुटल्याने त्यांच्या अंगावर ६० डिग्री सेल्सियसचे गरम पाणी पडले. त्यात मयत ९०% भाजले होते. त्यांना कंपनी प्रशासनाने तत्काळ घोटवडे फाटा येथील संजीवन रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. मात्र त्यात सोनवणे व तिवारी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नवनाथ संभाजी नारावडे (वय ४०, रा.पिरंगुट, ता.मुळशी) हे जखमी झाले आहेत.
हलगर्जीपणा करत अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या मेंटेनन्स मॅनेजर अविनाश श्रीहरिचंद्र दिवान व सुपरवाइजर सलामुद्दीन फत्तेउद्दीन यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत.