पौड : मुळशी तालुक्यातील उरवडे रोडवर कंपनीला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून यामध्ये १५ महिला तसेच २ पुरूष असल्याचे समोर येत आहे. झालेल्या घटनेमध्ये मृताची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज दुपारी अडीचच्या दरम्यान एसव्हीएस कंपनीला आग लागली. तेव्हा कंपनीमध्ये ४१ कामगार होते. यापैकी १७ कामगार बेपत्ता झाले असल्याचे निदर्शनास येत असून या १५ महिला तसेच २ पुरूष असल्याचे समोर आले आहे.
घटना स्थळावर जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,प्रांतधिकारी संदेश शिर्के, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, तहसिलदार अभय चव्हाण,पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर उपस्थित आहेत.
तर अग्निशामक तसेच रूग्णवाहिका देखील घटना स्थळावर असून मृतदेह अक्षरशः पोत्यात घालून बाहेर आणण्यात येत आहे. कंपनीची भिंती मागील बाजूने फोडण्यात आलेले असून मशनिरीही वितळून गेलेल्या आहे. पीएमआरडीएचे जवान,पोलिस यंञणा,आपत्ती व्यवस्थापन समिती आपला जीव धोक्यात घालून आत जाऊन मृतदेहाचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढत आहे. सदरचे मृतदेह हे रूग्णवाहिकेतून ससून रूग्णालयात पाठविण्यात येत आहेत.