सुभाषभाऊंचे आदर्श व्यक्तीमत्त्वाची पुढील पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने ग्रामस्थांच्या वतीने साकारण्यात आलेल्या "सुभाषभाऊ अमराळे प्रवेशद्वार" या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा दि. २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता मु. अमराळेवाडी (आदर्शगाव अंबडवेट) येथे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहे.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते काशिनाथ उभे, वेदाचार्य आचार्य मंदार स्वामी येनपुरे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे कृष्णा भिलारे, जलतरणपटू गीता मालुसरे, चार्टर अकाउटंट सायली गोरड, गुणवंत विद्यार्थिनी स्वाती पाटील यांना विशेष "सुभाषभाऊ अमराळे स्मृती" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सायंकाळी सहा ते आठ या वेळात अनिल महाराज पाटील यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून महाप्रसादाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सुभाषभाऊ हे एक आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणुन मुळशी तालुक्यांत घराघरांत पोहोचले होते. दुग्धव्यावसाय करत असताना समाजसेवेचा वारसा त्यांनी जपला होता. जिल्हा परिषद सदस्य पदावर कार्यरत असताना अनेक समाजोपयोगी कामे करीत "आदर्श जिल्हा परिषद सदस्य" हा बहुमान त्यांनी मिळवला. परंतु मागील वर्षी कोरोनाच्या काळात त्यांचे दुख:द निधन झाले, त्याचे कुटुंब, गाव तसेच संपुर्ण मुळशी तालुक्यावरच दु:खाचा डोंगर कोसळला. सुभाषभाऊ आपल्यातुन गेले हे कोणालाच खरे वाटत नव्हते. त्यांच्या या आदर्श व्यक्तीमत्त्वाची पुढील पिढीला प्रेरणा मिळावी यासाठीच ही स्वागत कमान उभारली आहे.