मुळशी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांना साथ देत पुणे जिल्ह्यातील बारा मावळांनी या राष्ट्रउभारणीच्या नवकार्यात पूर्णपणे झोकून दिले. शिवरायांच्या स्वातंत्र्याच्या प्रयोगशाळेतील महत्वाचा घटक असलेल्या पवन मावळाने स्वराज्य उभारणीत अर्पिलेल्या योगदानाचा वारसा आजही सक्रीयपणे जपलेला दिसतोय. मावळातील पवना धरणाच्या काठावर वसलेल्या गेव्हंडे खडक मधील खैरे परिवारातील तीनही पिढ्या पानिपताच्या रणभूमीवर अभिवादन करायला उत्स्फूर्तपणे जात असताना नेमकी हीच अनुभूती प्रत्यक्षात दिसत आहे.
पानिपताच्या युद्धाला २६१ वर्षे पूर्ण झाली म्हणून आपल्या कर्तृत्वशाली पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एक प्रतिकात्मक मोहीम ८ जानेवारीस पुण्यातील शनिवारवाड्यावरुन पानिपतावर जाणार आहे. या अफलातून मोहिमेत गेव्हंडे खडकमधील रहिवासी असलेल्या सौ. रंजना लक्ष्मण खैरे (वय ५८), त्यांच्या सूनबाई, रावडे-मुळशीच्या माहेरवाशिण सौ. नीलिमा विजय खैरे (वय ३०) व नाती कु. कामाख्या (वय ८) आणि शिवाज्ञा (वय ४) सहभागी होणार आहेत. यावर्षी ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पानिपतावर केवळ ५० च्याच संख्येने कार्यक्रम होणार असल्याने यंदाची मोहीम अगदीच मोजक्या संख्येत जाणार आहे.
पानिपताच्या तिसऱ्या लढाईत जर मराठी शक्ती कमकुवत होऊन मराठ्यांचा उत्तर हिंदुस्थानातील प्रभाव कमी झाला नसता तर १७५७ च्या प्लासीच्या लढाईत जिंकलेल्या इंग्रजांना संपूर्ण देशावर आपला अधिकार निर्माण करायला संधीच मिळाली नसती. देशाच्या तिसऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण 'महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले l मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ll खरा वीर वैरी पराधिनतेचा l महाराष्ट्र आधार भू भारताचा ll' याची अनुभूती स्वतःशी करवून घेऊन संपूर्ण देशालाही पटवून द्यायला हवीय, याचं जागरण करण्यासाठीच ही संकल्पित मोहीम जाणार आहे. आजही देशाच्या अर्थकारणावर संपूर्णत: पकड ही महाराष्ट्राचीच आहे, संरक्षण खात्याची अत्यधिक विभागांची मुख्यालयेही महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे देशाच्या सीमा रक्षणाची आणि कारभाराची आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा आपणच जपली पाहिजे आणि त्याचा विचार सर्वसामान्य मराठी मनांमध्ये रुजला पाहिजे, या भावनेने सक्षम आत्मनिर्भरतेचा संदेश देत या माय-लेकी आपल्या आजीसह पानिपताच्या शौर्यभूमीवर चालल्या आहेत.
पानिपतावर जाणारी ही प्रतिकात्मक मोहीम ८ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेऊन, लाल महालात जिजाऊंच्या मूर्तीस अभिवादन करुन शनिवारवाड्यापासून निघेल. १४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी पानिपताच्या शौर्यभूमीवर अभिवादन करुन परतीच्या मार्गात निर्धारित सभा, जागरण मेळावे घेऊन पुन्हा २० जानेवारीस पुण्यास परतून लाल महालामध्ये संपेल.