मुळशी : हिंजवडी परिसरातील आयटी पार्क मधील कंपन्या पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आमदार संग्राम थोपटे यांना निवेदन दिले आहे.
याबाबत गणेश जांभुळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, करोनाची परिस्थिती उदभवल्यानंतर राज्यातील सर्वच क्षेत्र बंद करण्यात आली. मात्र आता करोनाचा जोर ओसरल्यानंतर अनेक उद्योग व्यवसाय पूर्व पदावर आलेले आहेत. जसे की राज्य सरकारने मंदिरे सुरू केली. बस सेवा पूर्वरत केली. याच धर्तीवर हिंजवडी परीसरात असलेले आयटी पार्क मधील कंपन्याचे वर्क फॉर्म होम बंद करून कंपन्या नियमित सुरू कराव्यात. जेणेकरून गेल्या अकरा महिन्यापासून बंद असलेले व्यवसाय सुरू होतील. आयटी पार्क बंद असल्याने अनेक छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक, कॅब चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच अनेक कामगार आपल्या मूळ गावी गेल्याने घरे रिकामी झाली आहेत. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
त्यामुळे वर्क फॉर्म होम बंद करून कंपन्या नियमित सुरू कराव्यात अशी मागणी हिंजवडीकर नागरिक करत आहे.