पिरंगूट : गांधी जयंतीचे औचित्य साधत या वर्षी रामनदीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २६ सप्टेंबर ते २ आक्टोबर २०२१ या सात दिवसांचा हा स्वच्छता सप्ताह आहे.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या ७ वर्षांपासून लोकसहभागातून रामनदी स्वच्छता अभियान , रामनदी भुजल अभियान , रामनदी जलदिंडी , रामनदी परिक्रमा असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील सुमारे ५००० हजार ट्रक गाळ काढण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामुळे तलावात २५००० लोकसंख्येला १०० दिवस पुरेल एवढा पाणी साठा वाढला आहे.भुगाव आणि भुकूम गावाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत्या नागरीकीकरणामुळे एप्रिल मे महिण्यात दरवर्षी पाणी टंचाईला आणि पाणी कपातीला सामोरे जावे लागत होते .या कामांमुळे गेल्या दोन वर्षात ही पाणी टंचाई कमी झाली आहे असे मत अनिल पवार यांनी या वेळी व्यक्त केले.
पुण्याच्या पश्चिम दिशेला भुगाव आणि भुकूम गावच्या हद्दीवर रामनदीवर असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय स्वच्छ करण्यासाठी आणि हा जलाशय या भागातील प्रमुख आकर्षण करण्यासाठी भुगाव व भुकूम या दोन्ही ग्रामपंचायती पुढाकार घेणार असल्याचे या वेळी भुकूमचे उपसरपंच सचिन आंग्रे आणि भुगावच्या सरपंच निकीता सणस यांनी सांगितले आहे.
भुगाव, भुकूम ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या रामनदी स्वच्छता अभियानाअंतर्गत या स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . रविवार दि २६ सप्टेंबर रोजी सकाळी तलावाच्या भिंतीवर या स्वच्छता सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवशी या स्वच्छतेसाठी शांताराम इंगवले, रमेश सणस, भुकूमचे उपसरपंच सचिन आंग्रे, भुगावचे माजी उपसरपंच सतिश इंगवले ,भुकूम ग्रामपंचायत सदस्य सचिन हगवणे निलेश ननावरे ,विजयभाऊ माझीरे , विशाल सुर्वे,प्रविण पवार ,रोहीदास आमले ,तेजस पवार ,संतोष महाराज सुर्वे ,प्रकाश इंगवले यशवंत शेडगे ,नितीन शेडगे आणि रामनदी स्वच्छता आभियानाचे प्रमुख, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार उपस्थित होते.