पिरंगुट - करोना महामारीत अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. तिसऱ्या लाटेची शंका वर्तविली जात आहे. मुळशी तालुक्यातील सार्वजनिक उत्सव मंडळांनी येणारा दहीहंडी उत्सव व गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथे पौड पोलिस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ बोलत होते. या बैठकीला पिरंगुट, भुगाव, भुकुम, लवळे, कासारआंबोली, मुकाईवाडी, उरावडे, भरे आदी गावांतील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस ठाण्याच्या वतीने आज पौड, कोळवण व इतर गावातील मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले की, करोना महामारीमुळे आर्थिक संकटही उभे राहिले आहे. त्यामुळे मंडळाने वर्गणी गोळा करू नये. गतवर्षी प्रमाणेच यावर्षी गणेशोत्सव साजरा करावा. श्रींची आगमन व विसर्जन मिरवणूक ही काढू नये. शक्यतो जागेवरच मूर्तीचे विसर्जन करावे.
यावेळी पोलिस हवालदार संजय सुपे, सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच राहुल पवळे, पोलिस पाटील प्रकाश पवळे, माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, माजी उपसरपंच रामदास पवळे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पवळे, माजी उपसरपंच महादेव गोळे, माजी उपसरपंच अंकुश नलावडे, माजी उपसरपंच विकास पवळे, प्रवीण कुंभार, लक्ष्मण निकटे, ग्रामपंचायत सदस्य महेश वाघ, शाकीर शेख तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.