पिरंगुट : कंपनी व्यवस्थापनाचा मनमानीपणा आणि प्रशासनाने त्याकडे केलेला कानाडोळा यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. याघटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी. तसेच राजकीय मंत्री व नेत्यांनी केवळ घटनास्थळी भेटी देवून फोटोसेशन करण्यापेक्षा कागदी घोडे न नाचवता तत्काळ जाहीर केलेली मदत पीडितांच्या कुटुंबियांना मिळवून द्यावी. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टी पुणे व मुळशीच्या प्रमुख पदाधिकार्यांनी आज दुपारी उरवडे येथील दुर्घटनेची पाहणी करून दुर्घटनेत निष्पाप जीव गेलेल्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी देखील चर्चा करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार शरदराव ढमाले, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य व मुळशी तालुका प्रभारी भारती विनोदे, मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, जिल्हा कार्यालयीन प्रमुख वसंत काका चोरघे, जिल्हा युवा संघटन सरचिटणीस जीवन साखरे, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली सणस, युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मारणे , कार्याध्यक्ष सागर मारणे, उपाध्यक्ष मारूती कुरूपे, कार्यकरणी सदस्य मनोहर सणस, दिपक माझीरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीताई विनोदे म्हणाल्या, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींचा या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये अनेक मुलां/मुलींच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. त्यामुळे अशा मुलांची यापुढील सर्व शैक्षणिक जबाबदारी राज्य शासनाने घेऊन कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी तत्काळ पाऊले उचलावी आणि भविष्यात अशी दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी.