logo
add image
add image
Blog single photo

छत्रपती शिवरायांच्या पादुकांचे २८ जूनला रायगडावरुन प्रस्थान


पौड : आषाढी वारीच्या निमित्ताने रायगड किल्ल्यावरून पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान २८ जून ला सकाळी ९ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरीपासून होणार असल्याची माहिती पालखी सोहळा संयोजन समितीकडून देण्यात आली. कोरोनामुळे शिवरायांच्या पादुका डोक्यावर घेऊन केवळ ५ शिवभक्त धारकरी रायगडवरून पंढरीस जाणार आहेत.

      गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रकोपामुळे रायगडावरून केवळ ३ शिवभक्त शिवरायांच्या पादुकांना घेऊन पंढरपूरला गेले होते. यावर्षी शिवाजी महाराज ४ जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शक्तिधारा-भक्तिसागर भेटीचा उत्सव ज्येष्ठ वद्य एकादशीच्या मुहूर्तावर हडपसरला ५ जुलैला पार पडणार आहे. तेथून पुढे शिवरायांची पालखी सोलापूर महामार्गाने चौफुला, दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी मार्गे १९ जुलैला पंढरपुरात मुक्कामी पोहोचेल. आषाढी एकादशीला चंद्रभागास्नान व नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आषाढी वारीतील शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा श्रीविठ्ठल मंदिरात पार पडेल. परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होऊन पालखी २३ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होणार आहे.

       छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मार्गावर दरवर्षी ५३ शाळांत भक्ति-शक्ति समन्वयाची शस्त्र व व्यायाम रिंगणे होत असतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ राजधानी रायगडावर ५ जणांचेच प्रतिकात्मक रिंगण होणार असून, बाकीची सारी रिंगणे स्थगित केल्याची माहितीही सोहळा समितीने सांगितली आहे. प्रसिद्धी-संपर्क माध्यमांच्या माध्यमातून यावर्षीच्या प्रस्थान ते स्वस्थान अशा संपूर्ण पालखी मार्गाचे दर्शन घरबसल्याच सर्वांना घडविले जाणार असल्याने पालखी मार्गावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहनही सोहळा व्यवस्थापनाने केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top