पौड : आषाढी वारीच्या निमित्ताने रायगड किल्ल्यावरून पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान २८ जून ला सकाळी ९ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरीपासून होणार असल्याची माहिती पालखी सोहळा संयोजन समितीकडून देण्यात आली. कोरोनामुळे शिवरायांच्या पादुका डोक्यावर घेऊन केवळ ५ शिवभक्त धारकरी रायगडवरून पंढरीस जाणार आहेत.
गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रकोपामुळे रायगडावरून केवळ ३ शिवभक्त शिवरायांच्या पादुकांना घेऊन पंढरपूरला गेले होते. यावर्षी शिवाजी महाराज ४ जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शक्तिधारा-भक्तिसागर भेटीचा उत्सव ज्येष्ठ वद्य एकादशीच्या मुहूर्तावर हडपसरला ५ जुलैला पार पडणार आहे. तेथून पुढे शिवरायांची पालखी सोलापूर महामार्गाने चौफुला, दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी मार्गे १९ जुलैला पंढरपुरात मुक्कामी पोहोचेल. आषाढी एकादशीला चंद्रभागास्नान व नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आषाढी वारीतील शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा श्रीविठ्ठल मंदिरात पार पडेल. परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होऊन पालखी २३ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मार्गावर दरवर्षी ५३ शाळांत भक्ति-शक्ति समन्वयाची शस्त्र व व्यायाम रिंगणे होत असतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ राजधानी रायगडावर ५ जणांचेच प्रतिकात्मक रिंगण होणार असून, बाकीची सारी रिंगणे स्थगित केल्याची माहितीही सोहळा समितीने सांगितली आहे. प्रसिद्धी-संपर्क माध्यमांच्या माध्यमातून यावर्षीच्या प्रस्थान ते स्वस्थान अशा संपूर्ण पालखी मार्गाचे दर्शन घरबसल्याच सर्वांना घडविले जाणार असल्याने पालखी मार्गावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहनही सोहळा व्यवस्थापनाने केले आहे.